ताज्या घडामोडी

वडिलांच्या मृत्यूने कोसळलेल्या पूनमचे अश्रू थांबेनात.ज्यांच्या हातून कन्यादान व्हायचे, त्याच बापाचे सरण आधी रचले गेले…

AB7

घरात लग्नाची तयारी, अन् डोळ्यांत अश्रूचा महापूर!

मालेगाव (जि. वाशिम) : घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच वधूपित्याच्यानिधनाची वार्ता समजताच आनंदाचे क्षण क्षणात दुःखात परिवर्तित झाले. पांगरी नवघरे येथील अल्पभूधारक शेतकरी राजू हरिभाऊ कालापाड (वय ४०) यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले.नावे दीड एकर शेती असलेले राजू कालापाड यांची मुलगी पूनम हिचे लग्न येत्या १४ मार्च रोजी ठरले होते. घरात वधू-वरांच्या कपड्यांची खरेदी, पाहुण्यांच्या याद्या आणि तयारीची लगबग सुरू होती. मात्र, या आनंदामागे आर्थिक विवंचनेची खोल जखम दडलेली होती. कष्टकरी बापाला मुलीच्या लग्नासाठी निधीची जुळवाजुळव करता आली नाही. गत आठ दिवसांपासून ते ओळखीच्या प्रत्येक दरवाजावर मदतीसाठी धाव घेत होते; मात्र अपेक्षित मदत मिळाली नाही. या विवंचनेतूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपविले.मनावरचे ओझे असह्य झाले!लग्नाची तारीख जवळ येत असताना आणि हातात पैसे नसल्याने मानसिक ताण वाढत गेला. २० फेब्रुवारीच्या सायंकाळी राजू कालापाड कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या शेतकऱ्यांना शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.पूनमचे अश्रू थांबता थांबेनात !राजू यांच्या पश्चात पत्नी उषा, मुलगी पूनम, दोन लहान मुले पवन व अक्षर आणि वृद्ध आई असा परिवार आहे. वडिलांच्या मृत्यूने कोसळलेल्या पूनमचे अश्रू थांबेनात.ज्यांच्या हातून कन्यादान व्हायचे, त्याच बापाचे सरण आधी रचले गेले… या नियतीच्या क्रूर खेळाने गावकऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी आणले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.